IMPIMP

Bachchu Kadu | “…तर विधानसभा निवडणूक लढणार नाही, महायुतीसाठी जागा सोडेन”; बच्चू कडूंची मोठी घोषणा

Bachchu-Kadu.jpg

मुंबई : Bachchu Kadu | लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ‘१९ तारखेला सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे. त्यांनी जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी निवडणुकीतून माघार घेईल’ अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Assembly Election 2024)

मी निवडणुकीतून माघार घेऊन माझी जागा महायुतीला देईल असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केले आहे. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या घोषणेनंतर एकच चर्चा सुरू झाली आहे. आमची तिसरी आघाडी नाही तर आम्ही शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची पहिली आघाडी तयार करू असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

“मी महायुतीत आहे असं कोण म्हणलं. मी महायुतीमध्ये नाही. सरकारला निवेदन देणार आहे. मागण्या मान्य झाल्या तर निवडणुका लढण्याची काय गरज आहे. आमची तिसरी आघाडी नसेल, तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी करणार आहोत. आमची आघाडी पहिली असेल. बाकीच्या सगळ्या आघाड्या नंतर येतील”, असं ते म्हणाले.

विधानसभा निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्याआधी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपल्या १८ मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे रोजगार हमीमधून करण्यात यावीत. ५० टक्क्यांच्या नफ्यासह शेतकऱ्यांना लाभ द्यावा. दिव्यांगाना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत अशा काही मागण्यांचा यात समावेश आहे. गरीब आणखी गरीब होत चाललाय, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेत. यामध्ये समानता येईल याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी देखील आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.