IMPIMP

Mohan Bhagwat | निवडणूकीत स्पर्धा करा पण मर्यादा पाळा, मणिपूरकडं लक्ष देण्याची गरज; सरसंघचालकांनी टोचले कान

June 11, 2024

नागपूर: Mohan Bhagwat | नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘निवडणूकीत स्पर्धा करा पण मर्यादा पाळा’ असे म्हणत सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत. १० वर्षे शांत राहिलेलं मणिपूर गेल्या वर्षापासून अशांत आहे. गेले दहा वर्ष तिथं शांतता होती. अचानक तिथं अशांतता घडली.

तिथं जे काही झालं, ते घडलं आहे की घडवलं आहे, असा प्रश्न आहे. तिकडं लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या सधन घरातील महिला मद्यपान करून वाहन चालवतात आणि लोकांना चिरडतात. कुठं चालली आहे आपली संस्कृती. जगात ज्यांनी संस्कृती तयार केली, त्यांची ही स्थिती चांगली नाही, असं भागवत यांनी स्पष्ट केले. “देशात एनडीएचं सरकार परत आले आहे. देशात गेल्या १० वर्षात बरंच काही चांगलं झालं. आर्थिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात आमची प्रगती झाली. मात्र, अजूनही प्रश्न संपलेले नाहीत. निवडणुकीत जो काही अतिरेक झाला, त्याच्या पुढं जाऊन आता आम्हाला विचार करायचा आहे.” असेही भागवत यांनी सांगितले.

भागवत पुढे म्हणाले, “प्रचारात ज्या पद्धतीनं चुकीचं वक्तव्य करण्यात आलं, अश्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होईल, याचा देखील विचार करण्यात आला नाही. यामध्ये आम्हाला नाहक ओढण्यात आलं. टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडण्याचा प्रयत्न झाला, ते योग्य नाही. निवडणूक लढताना एक मर्यादा असते, त्या मर्यादेचं पालन झालं नाही.

आम्ही आपलं राष्ट्रीय कर्तव्य करत असतो. मत देतो, प्रत्येक निवडणुकीत ते करतो. मात्र, असंच का झालं, का घडलं याच्या चर्चेत आम्ही पडत नसल्याचं सरसंघचालक मोहन भागवत म्हणले. निवडणूक म्हणजे दोन पक्ष असणारचं, त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा असते. ते एकमेकांना मागंपुढं करण्याचा प्रयत्न करतात आणि ते केलंही पाहिजे. मात्र त्यातही मर्यादा सर्वांनी पाळली पाहिजे. एकमेकांना मागं करण्यासाठी असत्याचा वापर करायला नको. नेतृत्व निर्माण झालंय मात्र, नेतृत्वाला समाजाची साथ मिळणं आवश्यक असल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत.