Mumbai Worli Hit & Run Case | वरळीतील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी मिहीर शाहला अटक
मुंबई: Mumbai Worli Hit & Run Case | वरळीतील ‘हिट अँड रन’ प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शाहला (Mihir Rajesh Shah) पोलिसांनी आज शहापूरमधून अटक केली. वरळीतील अपघातानंतर मिहीर शाह फरार होता. दरम्यान अपघातानंतर पोलिसांनी मिहीर याचे वडील राजेश शाह यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना काल कोर्टानं जामीन मंजुर केला होता. मिहीर शाह फरार झाल्यानंतर पोलिसांकडून लुकआऊट नोटीस बजावण्यात आली होती.
मिहीर शाह याने भरधाव कारने एका दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली होती. विशेष म्हणजे तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या अंगावर गाडी चालवत तिला फरफटत नेलं होतं. त्याने धडक दिल्यानंतर गाडी थांबवली असती तर महिलेचे प्राण वाचू शकले असते. पण आरोपीने गाडी न थांबवता त्याने दूरपर्यंत महिलेला फरफटत नेलं. यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी मिहीर शाह आपली गाडी मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर येथे सोडून पळून गेला होता. त्याने तिथून पळून जाण्याआधी त्याचे वडील राजेश शाह यांच्यासोबत फोनवर बोलणे केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आरोपी मिहीर शाह याने फोन बंद केला आणि तो पळून गेला होता. पोलीस त्याचा गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. पण तो सापडत नव्हता.
Comments are closed.