सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार, दि 3 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. अनेक प्रश्नांची उत्तरं देताना त्यांनी विरोधकांना टोलेही लगावले. केंद्र सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. विधीमंडळात शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर घणाघात केला. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे अशी टीका त्यांनी केली होती. यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
‘उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी, जनता या राहुल गांधीगिरीचा समाचार घेईलच’
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, चीनसमोर पळ काढे असे निलाजरे विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी. जनता या राहुल गांधीगिरीचा समाचार घेईलच असा इशाराही त्यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे.
"चीनसमोर पळ काढे" असे निलाजरे विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी… जनता या 'राहुल गांधीगिरी'चा समाचार घेईलच. pic.twitter.com/BeVriQgSrf
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 4, 2021
काय म्हणाले होते CM ठाकरे ?
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, विरोधी पक्षानं शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला.
आमचं सरकार शेतकऱ्यांसोबत आहेच.
मात्र दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांनी दिल्लीत येऊ नये यासाठी त्यांच्या मार्गात खिळे ठोकले.
ज्या तारांचं कुंपण देशाच्या सीमेवर टाकलं पाहिजे ते रजधानीच्या रस्त्यावर टाकलं आहे.
मात्र चीनसमोरून या सरकारनं पळ काढला. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे अशी अवस्था आहे.
जर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसाल तर तुम्हाला भारत माता की जय म्हणण्याचाही अधिकार नाही असा घणाघात ठाकरेंनी केला होता.