मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण खूप गाजत आहे. पोलीस Police अधिकारी सचिन वाझे यांच्यामुळे सरकारची खूप अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरु आहे. त्या चौकशीत मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्तांवर याचं खापर फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची महत्वाच्या मंत्री आणि नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित आहेत.
जर मुंबई पोलीस Police आयुक्तांची बदली झाली तर नवीन पोलीस आयुक्त कोण असणार याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत रजनीश शेठ, सदानंद दाते, विवेक फणसळकर, जयदीप सिंग, बी. के. उपाध्याय, डॉ. के. वेंकटेशम यांसारख्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. काल शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीला राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते सहभागी होते. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णयावर चर्चा झाल्याचे समजत आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
सचिन वाझे प्रकरणामध्ये मुंबई पोलीस Police प्रमुखांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत महत्वाची माहिती कशी पोहोचली? पोलीस दलातील आजही अनेक अधिकारी देवेंद्र फडणवीस यांना गुप्तपणे माहिती पोहोचवत असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूपासून ते मनसुख यांच्या पत्नीच्या जबाबापर्यंत सगळी माहिती बाहेर लीक झाली होती. हा प्रश्न राज्य सरकारमधील नेत्यांना पडला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांचे काहीच नियंत्रण नाही हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. सध्या गृह खात्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे शरद पवार आपली प्रतिमा बिघडू देऊ इच्छित नाही. त्यामुळे डॅमेज कंट्रोल म्हणून पोलीस आयुक्तांना हटविण्याचा विचार करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांना काढून कडक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.