मावळ: Maval Crime News | राज्यात पाण्यात बुडून मृत्यू घडणाऱ्या आकडेवारीत वाढ होत आहे. आठवड्याभरात राज्यात एकूण १५ पेक्षा अधिक जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला असताना आता मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) परिसरात अशीच आणखी एक घटना घडल्याचे समोर येत आहे.
मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अनिकेत घनश्याम तिवारी ( वय १८ रा.,मंत्रा सिटी तळेगाव दाभाडे मूळ रा. अभंपूर – रायपूर ,छत्तीसगढ) असे आहे. तो तळेगाव दाभाडे येथील डी वाय पाटील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.
संबंधीत घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था , आपदा मित्र मावळ , शिवदुर्ग मित्र लोणावळा , तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दलाच्या जवानांनी मोहीम हाती घेतली. अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत तळ्यावर पोहण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना ५ च्या सुमारास उघडकीस आली यानंतर अनिकेतचे शोधकार्य सुरु केले. सायंकाळी सुमारे ७.३० वा. पर्यंत शोधकार्य चालु होते.
अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. परत, शुक्रवारी (दि.२४) सकाळी ६.३० वा. सुमारास शोधकार्य सुरु केले असता सकाळी ७.४५ च्या सुमारास अनिकेतचा मृतदेह मिळाला.
या शोधकार्यात निलेश गराडे, अनिल आंद्रे, अनिश गराडे, गणेश गायकवाड, गणेश सोंडेकर, गणेश ढोरे, अविनाश कार्ले, कुंदन भोसले, ताहीर मोमीन, श्रीसंत भेगडे, कुणाल दाभाडे, शुभम काकडे, शेखर खोमणे, धीरज शिंदे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दल, पोलीस यांनी सहभाग घेतला.
राज्यात 15 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू
उजनी बोट दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर नाशिक येथील भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर नाशिक मध्येच मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील विहरीत विवाहितेसह मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पुण्यातील पाबळ मध्ये दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे.तर आता मावळात आणखी एक तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.