दिल्ली: Rahul Gandhi On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत भाष्य केले होते. त्यावरून आता राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. “महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती मात्र आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झाले. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काही केले नाही.” असे वक्तव्य मोदींनी केले होते. त्याला आता राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी म्हणाले, ” तुम्हाला फक्त सत्ता हवी आहे. आम्ही त्या पलिकडे गेलो आहोत. मला विरोधी पक्षात बसल्याचा अभिमान आहे. महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. मात्र आपले जे पंतप्रधान आहेत त्यांचा थेट परमात्म्याशी संवाद आहे. ते रोज देवाशी संवाद साधतात. परमात्मा आणि मोदींशी चर्चा करतो. आपण सगळे जैविक (बायोलॉजिकल) आहोत. आपण जन्माला आलो आहोत, एक दिवस आपला मृत्यू होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अजैविक (नॉन बायोलॉजिकल) आहेत. त्यांनी म्हटलं की महात्मा गांधींचा मृत्यू झाला आणि गांधी सिनेमा आला म्हणून जगाला त्यांची ओळख झाली. दुर्लक्षाची परिसीमा लक्षात घ्या. सिनेमामुळे गांधी जगाला कळले असं पंतप्रधान म्हणाले होते. पण मी सांगू इच्छितो महात्मा गांधींचा मृत्यू झालेला नाही ते आहेत. कारण धैर्य किंवा धाडस याबाबत एक धर्म बोलत नाही. तर प्रत्येक धर्म या गोष्टीचा उल्लेख करतो”.
ते पुढे म्हणाले, ” मागच्या दहा वर्षांत लोकांना घाबरवणं, तुरुंगात टाकणं हे प्रकार सर्रास सुरु होते. जे लोक भाजपाच्या विरोधात बोलतील त्यांच्या विरोधात ठरवून कारवाया झाल्या. मीडियाचा वापर करुन मलाही नावं ठेवण्यात आली. माझ्यासाठी गंमतशीर भाग होता तो म्हणजे ५५ तासांची ईडी चौकशी. कारण ती चौकशी संपल्यानंतर त्या अधिकाऱ्याने कॅमेरा बंद केला आणि मला म्हणाला राहुल तुम्ही एखाद्या दगडासारखे इथे ५५ तास बसून आहात तुम्ही हलत कसे काय नाही?
जेव्हा अशा प्रकारचा राजकीय हल्ला केला जातो तेव्हा तुम्ही स्थितप्रज्ञ असावं लागतं. आम्ही भारताच्या मूळ संकल्पनेसह उभे आहोत त्यामुळे आम्हाला उर्जा मिळते. आम्ही अशा संकटांना निर्भिडपणे तोंड देऊ शकतो असं राहुल गांधी म्हणाले. आमची उर्जा भगवान शंकर आहेत असं राहुल गांधींनी म्हटलं आणि त्यानंतर स्पीकर ओम बिर्ला यांनी यावर आक्षेप घेतला. कुठलंही चित्र तुम्ही लोकसभेत दाखवू शकत नाही असे ते राहुल गांधींना म्हणाले. त्यानंतर आम्हाला भगवान शंकराकडून कशी प्रेरणा मिळाली हे राहुल गांधींनी भाषणात सांगितलं.