पुणे : Rahul Gandhi Sabha In Pune | | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील सभेतून शरद पवारांचा (Sharad Pawar) भटकती आत्मा असा उल्लेख करत टीका केली होती. या टीकेला पुण्यातूनच राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केला आहे. राहुल गांधी म्हणाले, वरिष्ठ नेत्यांबद्दल काहीही बोलणे हे पंतप्रधानांना शोभते का. त्यांनी पंतप्रधान पदाची गरिमा ठेवली नाही. त्यांनी विकास आणि देशाबद्दल बोलले पाहिजे, शेतकऱ्यांवर बोलले पाहिजे. पण, शरद पवारांवर बोलले म्हणजे लोकांना आवडेल असे त्यांना वाटते का, असा सवाल राहुल गांधींनी पुण्यातून विचारला. (Pune Lok Sabha)
पुणे येथे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची आज सायंकाळी प्रचारसभा झाली. यावेळी राहुल गांधी बोलत होते. मोदी सरकारला संविधान मिटवायचं आहे, मोदी आपले नसून ते आदाणींचे आहेत, असे गंभीर आरोपही त्यांनी केले.
कर्नाटकातील रेवण्णा प्रकरणावर राहुल गांधी म्हणाले, रेवण्णाने ४०० महिलांवर बलात्कार केला आहे, मोदींनी त्याच रेवण्णासाठी मते मागतिली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयास भाजपाच्याच एका नेत्याने पत्र लिहून रेवण्णावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, गृहमंत्र्यांनी काहीही कारवाई केली नाही. तरीही नरेंद्र मोदी या रेवण्णासाठी कर्नाटकात जाऊन मत मागत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी कधी पाकिस्तानची गोष्ट सांगतील, कधी समुद्राच्या खाली जाऊन ड्रामा करतील, समुद्रात खाली गेल्यानंतर ते घाबरले होते हे तुम्ही पाहिले असेल, काही होणार तर नाही ना. त्यांनी राजकारणाची गंमत लावली केली आहे.
राहुल गांधी म्हणाले, देशातील पत्रकार आणि एंकर मोदींच्या पे रोलवर असल्यासारखे वागत आहेत. देशातील मिडीया या मागास असलेल्या ७३ टक्क्यांचे प्रश्न मांडत नाही. मिडीयाचे मालक, मोठे पत्रकार आणि एंकर यामधे यांना स्थान नाही म्हणून त्यांचे प्रश्न मांडले जात नाहीत. मिडीया अंबानीच्या घरातील लग्न दाखवतात, अशी टीका राहुल यांनी केली.
मोदींवर आरोप करताना ते म्हणाले, इलेक्ट्रोरल बॉन्डच्या माध्यमातून मोदींनी भ्रष्टाचार केला आहे. मोदींनी २२ उद्योगपतींचे १६ लाख रुपयांचे कर्ज माफ केले. तसेच बजेटमधील पैसे खर्च करण्यावर मोजक्या लोकांचा अधिकार असल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, कॉंग्रेसचे सरकार आल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करू आणि आर्थिक सर्वेक्षण करणार आहोत. यातून न्यायालय, मिडीया, आणि अधिकारीवर्गात मागासवर्गीय किती आहेत याची आम्ही पडताळणी करु. त्यानंतर भारताचे राजकारण बदलून जाईल. हे क्रांतिकारक पाऊल असेल, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.