मुंबई: Devendra Fadnavis – Maratha-OBC Reservation | लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. मराठा आरक्षण हा त्यातील महत्वाचा मुद्दा ठरला. दरम्यान राज्यातल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फ्रंटफूट वर दिसले नाहीत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाने फडणवीसांना आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन फ्रंटफूटवर येणे भाग पडत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण (Maratha Reservation Andolan) प्रश्नावर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपोषणाची सुरुवात अंतरवली सराटीतून केली होती. दरम्यान अंतरवलीत झालेल्या लाठीचार्ज प्रकरणानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. त्यांचा राग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. मनोज जरांगे यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली.
त्यानंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हाताळले. देवेंद्र फडणवीस या प्रकरणात कधी फ्रंटफूट आले नाहीत. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस आरक्षण प्रकरणात फ्रंटफूट येऊ लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली होती. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जात आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
तर आता मराठा आंदोलकांप्रमाणे ओबीसी आंदोलकांसोबत चर्चा त्यांनी सुरु केली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकारतर्फे शिष्टमंडळ शुक्रवारी पाठवण्यात आले. या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन (Girish Mahajan) होते.
मनोज जरांगे पाटील यांनी सगे सोयऱ्यांची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी फ्रंटफूट येऊन हा विषय हाताळण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.