मुंबई: Maharashtra Cabinet Expansion | लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला (Mahayuti) म्हणावे असे यश मिळाले नाही. भाजपची (BJP) खासदारांची संख्या घटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आगामी विधानसभेची तयारी म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याबाबत आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. (Maharashtra Monsoon Session)
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे. भाजपला ६, शिंदेसेनेला ५, तर तर अजित पवार गटाला ३ मंत्रीपदे दिली जाऊ शकतात. अशी माहिती मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला चार महिने उरले असताना रिक्त १४ मंत्रीपदे भरण्याच्या हालचाली सुरु आहेत.
अधिवेशन १२ जुलै रोजी संपेल. त्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक पुण्यात पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती मिळत आहे. भाजपने ६ जागा घ्याव्यात आणि आणि आठ पैकी चार-चार मंत्रीपदे शिंदेसेनेला आणि आम्हाला द्यावीत असे अजित पवार गटाचे म्हणणे आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे ५ मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे बोलले जातेय.
भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे, डॉ. संजय कुटे आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके यांचे नाव जवळपास नक्की मानले जाते. त्याशिवाय, माजी मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार आणि जयकुमार गोरे किंवा राहुल कूल यांच्या नावाचीही चर्चा आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार करा असा मोठा दबाव शिंदे सेना आणि अजित पवार गटाकडून सत्तापक्षावर असल्याचे समजते. शिंदे यांच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. अजित पवार गट सोबत आला नसता तर आतापर्यंत आपल्याला मंत्रिपद मिळाले असते असे या पक्षातील काही आमदारांना वाटते.
सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री व दोन मुख्यमंत्र्यांसह २९ मंत्री आहेत. त्यात भाजपचे १०, शिंदेसेनेचे १०, अजित पवार गटाचे ९ मंत्री आहेत. नियमानुसार मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ४३ राहू शकते. याचा अर्थ आणखी १४ जणांना मंत्रीपदे दिली जाऊ शकतात.