मुंबई: Maharashtra Monsoon Session | विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. विधानपरिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधानपरिषदेत (Vidhan Parishad) मांडला. या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार गोंधळ सुरु झाला.
राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या विधानावरुन विधान परिषदेत चर्चा सुरू झाली होती. यावरुन भाजपा आमदार प्रसाद लाड विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे बोट करुन बोलत होते. यावेळी अंबादास दानवे जाग्यावरुन उठले आणि म्हणाले, सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे हे वक्तव्य ज्यांचं असेल त्याचं ते लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? असा सवालही दानवे यांनी केला. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी गटातील आमदारांनी गोंधळ सुरू केला. यावेळी अंबादास दानवे यांचा तोल सुटल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. दानवे म्हणाले, माझा तोल सुटलेला नाही, मी शिवसैनिक आहे. माझ्यावर कोणी बोट उचललं तर बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. जो या सभागृहाचा विषय नव्हता, सभापतींना बोलायला हवं होतं. माझ्याकडे बोट दाखवून, माझ्याकडे हातवारे करुन बोलायचा अधिकार नाही. मग माझा, आमदार विरोधी पक्षनेता नंतर सगळ्यात मी आधी शिवसैनिक आहे. हे आता मला हिंदुत्व शिकवणार का?, असंही अंबादास दानवे म्हणाले.
यावर भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाड म्हणाले, मी शिवी दिली नाही, ते माझ्या अंगावर आले. मी त्यांना सांगितलं तुम्ही असं बोललात तर आम्हीही तसेच बोलू. आम्ही त्यांच्यासोबत कुठेही बोलायला तयार आहोत असंही आमदार लाड म्हणाले.