मुंबई: Uddhav Thackeray On Ambadas Danve Suspension | विधिमंडळात अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला होता. यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी निलंबनाची घोषणा केली. यावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत घेतलेल्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ” अंबादास दानवे यांना त्यांची बाजू मांडायला द्यायला हवं होतं. ठरवून हे षडयंत्र रचून विरोधकांना निलंबित केलं आहे. महाराष्ट्राची जनता डोळे उघडे ठेऊन हे पाहात आहे.
महिलांचा अपमान झाला असेल तर माफी मागतो पण अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या शिव्याचं काय? तसेच त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आणि विचारले की ते माफी मागणार का?
ते पुढे म्हणाले, ” राहुल गांधी (Rahul Gandhi) नेमकं काय म्हणाले होते? त्यांनी खरंच हिंदुत्वाचा अपमान केला होता का? काल राहुल गांधी म्हणाले भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. माझं देखील तेच म्हणणं आहे. मी भाजपाला सोडलं आहे हिंदुत्व नाही.
विधानपरिषदेत नेमकं काय घडलं
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधानपरिषदेत मांडला. या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार गोंधळ सुरु झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या विधानावरुन विधान परिषदेत चर्चा सुरू झाली होती. यावरुन भाजपा आमदार प्रसाद लाड विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे बोट करुन बोलत होते.
यावेळी अंबादास दानवे जाग्यावरुन उठले आणि म्हणाले, सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे हे वक्तव्य ज्यांचं असेल त्याचं ते लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? असा सवालही दानवे यांनी केला. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी गटातील आमदारांनी गोंधळ सुरू केला. यावेळी अंबादास दानवे यांचा तोल सुटल्याचे पाहायला मिळाले.