पुणे : Ajit Pawar On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे आणि मी एकत्र काम केले आहे. आमच्यात त्यावेळी कोणतेही मतभेद नव्हते. आता ते लयलूट केली म्हणून म्हणत असतील तर त्यांनी कुठे आणि कधी लयलूट झाली हे सांगावे. निवडणुकीच्या दिवसांत अनेकजण टीका करतात. यावेळी कोणतीही टीका गांभीर्याने घ्यायची नसते, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Govt) केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. महाराष्ट्र लुटला जात आहे आणि लुटारुंच्या हाती महाराष्ट्र दिला जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती
मोदी भटकती आत्मा कुणाला म्हणाले, असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले, मोदी कोणाला उद्देशून म्हणाले ते मला माहिती नाही. मी त्या सभेमध्ये होतो. पुढच्या सभेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल तेव्हा मी मोदी साहेबांना विचारतो. भटकती आत्मा हा उल्लेख कोणाला डोळ्यासमोर ठेवून केला आहे का हे विचारून तुम्हाला उत्तर देतो.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मी कुणाला धमकी दिली नाही. आज विरोधकाकडे कुठलाही मुद्दा राहिला नाही. म्हणून गैरसमज पसरवला जात आहे. आम्ही त्यांच्याबरोबर असतानाही कधी धमक्या दिल्या नाही. यापुढेही धमक्या दिल्या जाणार नाहीत.
अजित पवार म्हणाले, मोदी साहेबांच्या विरोधात कुठलाही मुद्दा विरोधकांना राहिला नाही. खालचे मुद्दे वर येतात. मोदी साहेबांवर भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही आरोप दहा वर्षात झाला नाही. त्याबद्दल हे कोणी काही बोलत नाही. मोदींमुळे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावे लागले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी योगदान दिले त्यांना अभिवादन करतो. प्रत्येक अधिवेशनात राज्यपालांच्या भाषणात बेळगाव प्रश्न मांडला जातो. सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. बेळगाव भागातील मराठी भाषिकांना ज्या ज्या सवलती देता येतील त्या सरकारकडून दिल्या जात आहेत सुप्रीम कोर्टात सरकारने चांगले वकील लावले आहेत.