पुणे : NextGen Career Fest | देशाची वाटचाल ऊर्जा परिवर्तन, डिजिटल आणि एआय ट्रान्सफॉर्मेशनमधून सुरू आहे. अशा परिस्थितीत समाजाची गरज ओळखून, तंत्रज्ञानाचा आधार घेऊन योग्य करिअरची निवड करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी केले. करिअर निवडताना वेळ आणि कोणत्या दिशेने जायचे आहे, यांची संकल्पना स्पष्ट असणे आवश्यक आहे. हे समजण्यासाठी ‘एआय युगात..! चला, करियर घडवू’ प्रदर्शन उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्स, संवाद पुणे आणि हाऊस ऑफ सक्सेसतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे रिसर्च पार्क फाऊंडेशन, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, भावार्थ यांच्या सहकार्याने बालगंधर्व कलादालनात आयोजित तीन दिवसीय नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 24) कुलगुरू गोसावी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर, डोमेस्टिक वर्कर्स सेक्टर स्किल कौन्सिलच्या सीईओ मोना गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती तर आयसर कोलकाता गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन डॉ. अरविंद नातू अध्यक्षस्थानी होते. अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संजय गांधी, संवाद पुणेचे सुनील महाजन, हाऊस ऑफ सक्सेसचे प्रसाद मिरासदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाऊंडेशनचे सीईओ अरविंद शाळीग्राम, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे डॉ. मिलिंद वाकोडे उपस्थित होते.
‘भावार्थ’तर्फे डॉ. भूषण केळकर आणि डॉ. मधुरा केळकर यांच्या ‘करियरची गुणसूत्रे’ पुस्तकावर आधारित ‘एआय युगात..! चला, करियर घडवू’ या विषयावर प्रदर्शनी भरविण्यात आली असून सुरुवातीस मान्यवरांची प्रदर्शनाची पाहणी केली. मान्यवरांना प्रदर्शनाविषयी प्रसाद मिरासदार यांनी माहिती दिली. त्यानंतर नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
डॉ. गोसावी पुढे म्हणाले, सध्याच्या युगातील विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट आहेत. त्यांची धोरणे निश्चित आहेत. याच गोष्टी नवीन शैक्षणिक धोरणात मांडण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर विद्यापीठाची उपयुक्तता विशष करून म्हणाल्या, कौशल्यप्राप्त उद्योजक घडावा यासाठी विद्यापीठाचा प्रयत्न आहे. राज्य शासनाकडून आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याने वेगवेगळ्या क्षेत्रात कामाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
देशात संशोधनावर भर दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. अरविंद नातू म्हणाले, पदव्युत्तर शिक्षणानंतर विद्यार्थी संशोधनाकडे वळतात वास्तविक पदवीचे शिक्षण होण्याआधीपासून विद्यार्थी संशोधनाकडे वळला पाहिजे. विद्यार्थी पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना ‘आयसर’ त्या विद्यार्थ्याने 18 महिने संशोधन करावे यासाठी प्रयत्नरत असते. बदलत्या काळानुसार विद्यार्थी तंत्रकुशल असल्याते त्याला भविष्यात अडचणी येत नाहीत.
मोना गुप्ता म्हणाल्या, रोजगारानिमित्त भारतातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परदेशात जाऊन काम करणाऱ्या व्यक्तीला त्या त्या क्षेत्रातील योग्य ज्ञान असणे आवश्यक असल्याने ते ज्ञान देण्याचा डोमेस्टिक वर्कर्स सेक्टर स्किल कौन्सिलचा प्रयत्न आहे.
स्वागतपर प्रास्ताविकात संजय गांधी यांनी बदलत्या काळानुसार शिक्षण घेणे किती आवश्यक आहे याची माहिती होण्यासाठी नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. तर प्रसाद मिरासदार यांनी ‘एआय युगात..! चला, करियर घडवू’ चित्रप्रदर्शनाची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत डॉ. अरविंद शाळीग्राम, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील, पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे संचालक प्रा. सुनील रेडेकर, टीडब्ल्यूजे-भावार्थचे संचालक प्रसन्न करंदीकर यांनी केले. आभार सुनील महाजन यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि करियरची गुणसूत्रे’ या विषयावर न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स प्रा. लि.चे अध्यक्ष डॉ. भूषण केळकर यांचे व्याख्यान झाले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे चीफ मेंटॉर विवेक सावंत अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, स्वत: काय करायला जतमे, मी ते करू शकतो का आणि त्याची जगाला गरज आहे का या तीन मुद्द्यांचा विचार होणे आवश्यक आहे. या तीनही गोष्टींचा जेथे संगम होतो तेथे करिअर घडते. प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. जगाच्या पाठीवर कुठल्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत याविषयीही त्यांनी विवेचन केले. एनर्जी, एआय आणि ग्रीनसेक्टर या क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.