मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. विधिमंडळातही यावर चर्चा झाली होती. भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्नांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तरही दिले होते. त्यानंतर आता मनसेनेही यामध्ये उडी घेतली असून, सचिन वाझेंचं शिवसेना कनेक्शन उपस्थित करत सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला आहे. त्यामुळे वाझे यांच्यासोबतच शिवसेनेच्या अडचणीदेखील वाढण्याची शक्यता आहे.
श्री सचिन वाझे ह्यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस ह्या त्यांच्या कडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 6, 2021
संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, २००८ साली सचिन वाझे (sachin waze) यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? एवढेच नाही तर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात? असे प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आरोप
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आरोप केले आहेत. ठाण्यात सचिन वाझे यांचं घर आहे. ज्या गाडीची चोरी झाली होती, ती ठाण्यातच सापडली होती. चोरी झालेली गाडी ज्या मार्गाने आली आणि तिथं पार्क झाली तिच्यासोबत असणारी पांढऱ्या रंगाची इनोव्हाही ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमलं आहे. हे आश्चर्यकारक आहे, असं फडणवीस म्हणाले होते.
हिरेन बेपत्ता झाल्यानंतर क्रॉफर्ड मार्केटला सर्वांत आधी सचिन वाझे पोहोचले.
त्यांनाच तिथे चिठ्ठी सापडली. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी जून-जुलैमध्ये २०२० मध्ये संभाषण झालं होतं, असा आरोपही त्यांनी केला आहे.
अंबानी प्रकरण : ‘माझी मानसिक स्थिती ठीक नाही’, कारमालक मनसुखचं मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र