मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ इमारतीजवळ स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. आता या गाडीचे मालक मनसुख हिरेन ( mansukh hiren ) यांचा मृतदेह आढळला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागत आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ ( chitra wagh ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाण्यात राहणाऱ्या मनसुख हिरेन यांची चौकशी सुरू होती. मात्र, मुंब्रातील रेतीबंदर परिसरात हिरेन यांचा मृतदेह आढळला. ही घटना घडल्याने विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. याच प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी सरकारला धारेवर धरत ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले, की महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत असे अनेक मृत्यू झाले. कुणी सेलिब्रिटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य…आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…?’, असा सवाल आता चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून केला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले
कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी
आणि
आता मनसुख हिरेन…
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य…..
आणि
रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणार्या गोष्टी…….सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 5, 2021
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणीही चित्रा वाघ आक्रमक
गेल्या काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाणच्या आत्महत्ये प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत होता. चित्रा वाघ यांनीही या प्रकरणाता विशेष लक्ष घातले होते. त्यांनीही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राठोड यांनी राजीनामा दिला. आता त्यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.