IMPIMP

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

by sachinsitapure

पुणे : Chandrakant Patil | कॉंग्रेससह विरोधकांना पराभव स्पष्टपणे समोर दिसत आहे. त्यामुळे ते संविधान बदलाची भाषा करत आहेत. वास्तविक, कॉंग्रेसने स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी संविधानात वारंवार दुरुस्त्या केल्या, असा प्रहार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. अतुल साळवे आणि सुखदेव अडागळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधान रथाचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी रिपाइंचे नेते परशुराम वाडेकर, ॲड. मंदार जोशी, बाळासाहेब खंकाळ, बापू ढाकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. राहुल म्हस्के, भारत भोसले, मायाताई पोसते, उज्ज्वलाताई सर्वगोड, जितेश दामोदरे, अतुल साळवे, डॉ संदीप बुटाला, शाम देशपांडे , छायाताई मारणे, शिवसेनेचे मयुर पानसरे, मनसेचे गणेश शिंदे, राज तांबोळी, आशुतोष वैशंपायन, दीपक पवार, अनुराधा येडके, सुखदेव आडगळे, अजय मारणे, दिनेश माथवड , दिनेश माझिरे, नंदकुमार गोसावी, सुरेखा जगताप यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित.‌

नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या सर्वांवर अनंत उपकार आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० ला आपल्याला संविधान मिळालं. त्यातून देश आणि राज्य कसं चालवलं पाहिजे; याची नियमावली तयार करण्यात आली. यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेतली. २६ नोव्हेंबर १९४९ ला त्यांनी संविधानाचा मसूदा लोकसभेत सादर केला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी तो स्विकारला गेला. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दिवशी हा मसुदा लोकसभेत सादर केला; तो दिवस माननीय मोदीजींनी संविधान दिवस म्हणून जाहीर केला. या दिवशी देशभरात संविधानाचं पूजन केलं जातं. संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जातं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा असा सन्मान कॉंग्रेसने कधीही केला नाही.

ते पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच महिलांना आणि गरीबांना मताचा समान अधिकार मिळाला. गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदभाव केला नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचा संपूर्ण जगाने आदर्श घेऊन आपलं संविधान तयार केलं आहे.

कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना ते म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पासून अनेकवेळा घटनेत दुरुस्ती झाली. कॉंग्रेसने घटनेच्या मूळ गाभ्यालाच बोट लावले.‌ इंदिरा गांधी यांनी स्वत:चं पद टिकवण्यासाठी घटना दुरुस्ती केली. तसेच, वेळोवेळी संविधानातील कलमांचा गैरवापर करुन राज्य सरकारे बरखास्त केली. दुसरीकडे नरेंद्र मोदीजींनी गरिबांना नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण मिळवून दिलं. तसेच, महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं. अटलजींनी सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार मिळवून दिला. माननीय मोदीजींनी देशाची सुरक्षा लक्षात घेऊन ३७० कलम हटवले.

ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यातील सभेत आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, असं मत व्यक्त केलं. पण इतके वर्ष कॉंग्रेसचं राज्य देशात आणि राज्यात होतं. तेव्हा त्यांना याची आठवण का नाही झाली. १९९२ ला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकत होतं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार मुख्यमंत्री यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून दिले नाही. त्यामुळे विरोधकांना पराभव दिसू लागल्याने आरक्षण बदलणार अशी अफवा पसरवत आहेत. मोदी सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पाच ठिकाणं तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करून विकसित केली. कॉंग्रेसने का नाही केली. त्यामुळे दलित समाजाला याची जाणीव आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.‌

रिपाइं आठवले गटाचे नेते परशुरामजी वाडेकर म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे संविधान पूजक आहेत. ते पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक खासदाराला संविधानाचं महत्व कळावं; यासाठी लोकसभेत दोन दिवस संविधानाची कार्यशाळा सुरू केली. कॉंग्रेसने यासाठी कधीही असा पुढाकार घेतला नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे नरेंद्र मोदीजी यांच्या सारखी सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान पदी विराजमान होऊ शकली. त्यामुळे खालच्या जातीचा व्यक्ती पंतप्रधान होतो, हे कॉंग्रेससह विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे.

ते पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत भंडारा आणि मुंबईत झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव कॉंग्रेसने केला, आणि आता संविधान बदलाचा खोटा प्रचार करून त्याचे भांडवल करत आहेत, तर‌ ते बरोबर नाही.‌ संविधान धोक्यात नाही, तुम्ही धोक्यात आहात. इंदू मिल साठी जागा पंतप्रधान मोदींनी दिली. त्यामुळे माननीय मोदीजी हेच संविधान रक्षक आहेत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मंदार जोशी (Adv Mandar Joshi) यांनी केले. तर आभार जितेश दामोदरे‌ यांनी मानले.

Related Posts