मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. रविवारी राज्यात 11 हजारांवर कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना विधिमंडळात ( vidhan bhavan ) दाखल झाला आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच विधानसभेत मागील दोन दिवसांत तब्बल 36 कर्मचारी आणि नेते कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामुळे विधानसभेत एकच खळबळ उडाली आहे.
राज्याच्या विधानसभेतून 6 आणि 7 मार्च रोजी 2,746 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यामध्ये 36 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज (सोमवार) सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट आणखीनच गडद होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये राजकीय नेत्यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आलं आहे. यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची बाधा झाली होती. यामुळे विधिमंडळात खळबळ उडाली आहे.
यानंतर आता विधानसभा आणि विधान परिषदेतील 36 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट गडद झाले आहे. राज्यातदेखील कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउन होण्याची शक्यता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.