IMPIMP

Sanjay Raut On Baramati Lok Sabha | बारामतीच्या मैदानात संजय राऊतांची धुवांधार बॅटींग, PM मोदींसह चंद्रकांत पाटील, अजित पवार, एकनाथ शिंदेंना लगावले शाब्दिक फटकारे

by sachinsitapure

सासवड : Sanjay Raut On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी सासवडमध्ये आयोजित सभेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार भाषण केले. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजपा नेते अमित शाह (Amit Shah), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार घणाघात केला.

संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले, बारामती लोकसभेची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्तित्त्वाची आहे. गुजरातमधून दोन ऐरेगैरे येतात आणि आमच्या पराभवासाठी ठाण मांडून बसतात. शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्लीला कायम भीती वाटत आली आहे. आम्ही सगळे सुप्रिया सुळेंच्या पाठिशी आहोत.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा, असा करत संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील सांगतात की, बारामतीत आम्ही शरद पवारांना संपवण्यासाठी आलो आहोत. आले किती, गेले किती, संपले भरारा, पण शरद पवार अजूनही तुमच्या नावाचा दरारा. या वाक्यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

अजित पवारांवर टीकास्त्र डागताना संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे अनेक मतदारसंघांत भाषणांमध्ये व्यापाऱ्यांना धमक्या देतात. या व्यापाऱ्यांवर कोट्यवधींचा दंड लादला जातो. हा दंड मागे घ्यायचा असेल तर आमच्यासोबत या, आमचे काम करा, असे अजित पवार सांगतात. पण ४ जूननंतर जनताच तुम्हाला बघून घेईल, असे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मैदानात उतरुन निवडणूक लढवावी. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. धमक्या देणे हा आमचा जुना धंदा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी आमच्याकडे द्यावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी एक महिन्यात २७ वेळा महाराष्ट्रात आले. कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे. महाराष्ट्र दिल्ली उलथवून टाकेल, असे त्यांना वाटते. देशाचे पंतप्रधान गेल्या १० वर्षांपासून रोज खोटे बोलतात. इतके खोट बोलणारा पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि लूट गुजरातला न्यायची, हा उद्योग मोदी आणि शाह यांनी चालवला आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातला झाला होता. महाराष्ट्रावर चाल करुन येणारी व्यक्ती पंतप्रधान असली तरी आम्ही त्यांचा मान ठेवणार नाही. मोदी प्रचारसभेत खोटे बोलतात. त्यांना मुस्लीम बांधवांविषयी बोलणे शोभते का?, असा सवाल राऊतांनी केला.

मोदींवर बोचरी टीका करताना संजय राऊत म्हणाले, ज्यांनी घरातील मंगळसूत्राचा मान ठेवला नाही, त्यांनी मंगळसूत्राबाबत बोलू नये. देशातील हुकूमशाही उलथवून टाकली पाहिजे. शरद पवारांचा पराभव करण्यासाठी भाजपने त्यांचे घर फोडले. मराठी अस्मितेचे रक्षण करणारा शिवसेना पक्ष फोडला. पण त्यामुळे काय वाकडे झाले? आजही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्त्वात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या गटाला मी शिवसेना फडणवीस गट म्हणतो. तर अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस (Devendra Fadnavis) गट आहे. तुम्ही पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची, कोणीही सांगेल उद्धव ठाकरेंची आहे.

भाजपावर तोफ डागताना राऊत म्हणाले, भाजपला विकास जन्माला घालता आला नाही म्हणून आधी त्यांनी ठाण्याचा नवरा केला. मग नांदेडचा, आता बारामतीचा एक नवरा केला. तरीही विकास झाला नाही. तरीही अजित पवार म्हणतात, मी विकास केला. शरद पवारांनी बारामतीत हे सर्व निर्माण केले नसते तर तुम्ही अजूनही बारामतीमध्ये राजदूत मोटारसायकलवरुन दूध विकत बसला असतात.

संजय राऊत म्हणाले, तुम्ही इकडे मतदानावेळी सुप्रिया सुळे यांच्या नावासमोरचे बटण दाबा. मग ४ जूनला दिल्लीत हार्ट अ‍ॅटक येईल. मोदी आता राहत नाही. हे मी गेल्या तीन वर्षांपासून सांगत आहे.

Solapur Lok Sabha | राम सातपुतेंना ‘उपरा’ म्हणत प्रणिती शिंदेंचे भाजपवर टीकास्त्र

Related Posts