सरकारसत्ता ऑनलाइन – भाजप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षानं आणलेल्या 293 प्रस्तावांवर बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं. कोरोना संकटाच्या स्थितीत झालेला भ्रष्टाचार, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित यापासून तर सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणांपर्यंत (Pooja Chavan Suicide Case) विविध विषयांवरून नीतेश राणे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
‘राज्याला परिवहनमंत्री नाही, आहेत ते परिवार मंत्री बनलेत’
सभागृहात बोलताना राज्याला एक परिवहनमंत्री द्या, अशी मागणी करत नीतेश राणे (nitesh rane) यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, अध्यक्ष महोदय राज्याला एक परिवहनमंत्री द्या, राज्याला परिवहनमंत्री नाही. आहेत ते परिवार मंत्री बनले आहेत. ते कलानगरच्या अवतीभवती घुटमळत असतात. कलानगरच्या बाहेर पडावं, मंत्रालय आहे, एसटी कामगार आहेत. त्यांचा पगार आहे, त्यात लक्ष घाला, असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
My speech today in Vidhan Sabha https://t.co/pGdvWHVNAz
— nitesh rane (@NiteshNRane) March 5, 2021
‘आर्थिक संकट केवळ सामान्यांसाठी, सरकारकडून राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू’
पुढं बोलताना नीतेश राणे म्हणाले, अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा ठेवू नये, असं सरकार सांगतंय. राज्यासमोर आर्थिक संकट आहे असं सरकार सांगतंय. परंतु हे आर्थिक संकट केवळ शेतकरी आणि कामगारांसाठीच आहे का.
पण सरकारमध्ये बसलेले लोक राजरोसपणे लूट करताहेत. भ्रष्टाचार करताहेत.
त्याबाबतही विचार झाला पाहिजे. कारण हे आर्थिक संकट केवळ सामान्य लोकांसाठी आहे.
सरकारकडून राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे. त्याबाबत कुणी बोलत नाही.
सरदेसाईसारख्या व्यक्तींना सरकार पाठिंबा देतंय.
ते कंत्राटदारांना फोन का करतात, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का दिली जातेय, असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला.