मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या गाडी प्रकरणात मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारची कोंडी झाली आहे. एनआयएने वाझे यांच्याकडे केलेल्या चौकशीत वाझे यांनी काही बडे पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या संपूर्ण चर्चांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील jayant patil यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघडी सरकार बॅकफूटवर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या जयंत पाटील यांनी पत्रकाराशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याबाबत कोणतेही अंदाज बांधण्याची गरज नाही. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही. त्यामुळे अशा अफवा पसरवण्याची काहीही गरज नाही. राज्याचे गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रसारमाध्यमांमध्ये गृहमंत्री पदासाठी ज्या नावांची चर्चा होत असली तरी खातेबदल होण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट केले.
जयंत पाटलांकडून गृहमंत्र्यांची पाठराखण
सचिन वाझे प्रकरणात विरोधी पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. जयंत पाटील jayant patil म्हणाले, सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही चूक केलेली नाही. सचिन वाझे प्रकरणाचा तपास सध्या एनआयए करत असून, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. जे कोणी चुकीचे वागले असतील त्यांना शिक्षा होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
गृहमंत्रिपदासाठी ‘या’ दोन नेत्यांची नावे चर्चेत
अनिल देशमुख यांच्याकडे असलेल्या गृहमंत्रिपदाची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून दोन नावांचा मुख्यत्वे विचार होत असल्याची माहिती मिळत आहे. वाझे प्रकरणात सरकारची अडचण झालेली असताना डॅमेज कंट्रोलसाठी गृहमंत्रिपदी दुसऱ्या नेत्याची निवड होऊ शकते. सध्या यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. याशिवाय जयंत पाटील jayant patil यांचेदेखील नाव आघाडीवर आहे.