IMPIMP

Lok Sabha Election 2024 | ‘महायुती’ मध्ये सहभागाबद्दल मनसेचे कार्यकर्ते ‘वेट ऍन्ड वॉचच्या’ भुमिकेत ! ‘शत प्रतिशत’ची घोषणा असलेल्या भाजपकडून विधानसभा, महापालिकेत संधी मिळणार !

by sachinsitapure

पुणे : Lok Sabha Election 2024 | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपचे नेते अमित शहा (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीमध्ये (Mahayuti) सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत. परंतू लोकसभेसाठी जागा घ्यायची की राज्यसभा, विधान परिषदेसारखा पर्याय निवडायचा याबाबत अजुनही स्पष्टता नसल्याने महायुतीमध्ये सहभागाची अद्याप घोषणा झालेली नाही. यामुळे शहर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अद्यापही वेटींगवर आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य नेत्यांच्या मागील महिनाभरापासून भाजपचे स्थानीक नेते तसेच केंद्रातील नेत्यांसोबत भेटीगाठी सुरू आहेत. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतच सातत्याने चर्चा सुरू आहेत. या चर्चांचा तपशील बाहेर येत नसला तरी मनसे महायुतीमध्ये सहभागी झाल्यास नाशिक आणि मुंबईतील एक लोकसभेची जागा अथवा राज्यसभा आणि विधान परिषदेवर संधी देण्याबाबत वरिष्ठस्तराव बातचीत सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. यावरून मनसे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम असून निर्णय होईपर्यंत वेट ऍन्ड वॉचच्या भुमिकेत आहेत. महायुतीमध्ये सहभागी झाल्यावर आगामी विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha) आणि महापालिका निवडणुकीमध्ये (Maharashtra Municipal Elections) नेमके पदरी काय पडणार? असा प्रश्‍नही या कार्यकर्त्यांना सतावत असल्याचे काही कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर समोर येत आहे.

मनसेची स्थापना झाल्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये मनसेने पुण्यासह काही जागांवर उमेदवार उभे केले होते. पुण्यातून अनुक्रमे दिपक पायगुडे आणि रणजित शिरोळे हे निवडणुक लढले. पायगुडे आणि शिरोळे यांना ७५ हजारांवर मते मिळाली होती. परंतू त्यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेचे अनुक्रमे ८ आणि २९ नगरसेवक होते. यामध्ये कोथरूड, शिवाजीनगर आणि कसबा मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या अधिक होती. परंतू २०१४ च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या वादळात २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या अवघ्या दोनवर आली. तर नुकतेच त्यापैकी एक वसंत मोरे यांनीही आता पक्ष सोडला. यानंतरही आठ ते दहा माजी नगरसेवक मनसेसोबत आहेत.

मनसेच्या स्थापनेनंतर २००९ मध्ये मनसेचे पहिल्यांदाच १३ आमदार विजयी झाले. त्यामध्ये खडकवासला मतदारसंघातून विजयी झालेल्या रमेश वांजळे यांचा समावेश होता. मात्र, वांजळे यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेने उमेदवारच दिला नाही, तिथे भाजपचे भीमराव तापकीर विजयी झाले. यानंतर विधानसभेत मनसेची पाटी कोरीच राहीली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून मनसेचे ऍड. किशोर शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चांगलीच लढत दिली होती.

मनसेचा विधानसभा निवडणुकीतील परफॉर्मंस पाहाता महायुतीमध्ये गेल्यानंतर आठही मतदार संघात त्यांना भाजप अथवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मतदार संघ मिळणार नाही, हे जवळपास निश्‍चित आहे. राहाता राहीली महापालिका निवडणुकीपर्यंत महायुती अशीच राहीली तर कोथरूड, कसबा, कॅन्टोेंन्मेंट आणि शिवाजीनगर या मतदार संघात मागील निवडणुकीत बहुतांश जागेवर भाजपचे नगरसेवक निवडूण आले आहेत. २०१७ मध्ये भाजपने केवळ रिपाइंशी युती करून १६० हून अधिक जागा लढविल्या होत्या. त्यांना ९८ जागांवर यश मिळाले. महायुतीमध्ये यापुर्वीच शहरातील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना सहभागी झाल्याने त्यांना या तीन मित्र पक्षांसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. यानंतर मनसेला जागा सोडाव्या लागतील. यामुळे २०१४ नंतर शहरात ताकद वाढूनही माजी नगरसेवक आणि पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून भाजप मनसेला जागा देणार? असा प्रश्‍न मनसेच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे.

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाल्यानंतर ‘शत प्रतिशत’ची घोषणा असलेल्या भाजपाने दबावाचे राजकारण केल्यास मनसेचे इच्छुक देशोधडीला लागतील, अशी भितीही मनसेच्या कार्यकर्त्यांना सतावत असल्याचे चर्चेतून जाणवत आहे.

Pune News | 6 एप्रिल रोजी ‘सत्संग सिनर्जी’ कार्यक्रम; पर्यावरणस्नेही,सुरक्षित,कार्यक्षम बांधकामांसाठी मंथन

Related Posts