नाशिक : Sanjay Raut On Vasant More | मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी अचानक पक्षाला रामराम केला आहे. आता मोरेंची पुढील राजकीय भूमिका कोणती असणार याविषयी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यादरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, मोरेंनी वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये, एवढीच इच्छा, असे म्हटले आहे. यावेळी राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) त्यांच्यावर केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले.
खासदार संजय राऊत म्हणाले, वसंत मोरे लोकसभा लढवणार आहेत तर ते कुठून लढणार आहेत? रवींद्र धंगेकरांसारखे ते चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली म्हणजे काही वाईट केले नाही. पवार हे देशाचे नेते आहेत. त्यातून त्यांनी काहीतरी चांगले घ्यावे.
दरम्यान, संजय राऊत खोटे बोलतात, असा आरोप वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या आरोपावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, मी कधीच खोटे बोलत नाही. मी डॉ. आंबेडकरांच्या विचाराला मानणारा नेता आहे. ते सत्य मानणारे होते, मी सत्य सांगतो.
हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीत यावे. आम्ही त्यांना चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी ज्या जागांची मागणी केली त्याच त्या जागा आहेत. आता प्रकाश आंबेडकर खोटे बोलत आहेत, असे मी म्हणणार नाही, असे राऊत म्हणाले.
मविआच्या जागावाटपाबाबत राऊत म्हणाले, माझ्या सोबत स्वतः प्रकाश आंबेडकर चर्चेला बसले होते आणि त्यांचे शिष्टमंडळ वर्षभरापासून माझ्यासोबत चर्चा करत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आम्ही बसलो होतो. मविआमध्ये जागावाटपाचा कोणताही तिढा नाही. जागा वाटप पूर्ण झाले आहे.
राऊत पुढे म्हणाले, वंचितला जो प्रस्ताव दिला आहे त्यासाठी थांबलो आहोत. अशा चर्चा सोशल मीडियावर होत नाहीत. योग्य वेळी कोणत्या चार जागा दिल्या ते सांगू, जी बंद खोलीत चर्चा झाली ती उघड करण्यात मला रस नाही. प्रमुख लोकांनी बंद खोलीत केलेली चर्चा माध्यमांसमोर सांगणे राजकीय संकेतात बसत नाही, असे राऊत म्हणाले.