मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन ( womens day ) म्हणून साजरा केला जातो. महिला दिनाच्या दिवशी महिलांचा सन्मान व जागर करण्यात येतो. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तमाम महिलांना महिला दिनाच्या शुभेच्या दिल्या आहेत. तसेच ‘मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा?’ असा सवालसुद्धा राज ठाकरे यांच्याकडून विचारण्यात आला आहे. महिला दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी एका पोस्टद्वारे आपले मत मांडले आहे.
काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट ?
‘आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही, असा राज ठाकरे यांनी सवाल केला आहे. आमचे आजोबा म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील” छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी, तसेच महिलांचा सन्मान ३६५ दिवस साजरा करायला हवा, असे मत राज यांनी आपल्या पोस्टद्वारे मांडले आहे.
#महिलादिन#जागतिक_महिला_दिन#WomensDay#womenempowerment pic.twitter.com/vB5pyghObz
— Raj Thackeray (@RajThackeray) March 8, 2021
राज ठाकरे माता-भगिनींना उद्देशून पुढे म्हणतात, तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ‘राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून राहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता,’ असे परखड मत मांडत राज ठाकरे यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्या दिल्या आहेत.